डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळस्कर दोषी; तर तीन आरोपींची निर्दोष सुटका

Narendra Dabholkar Death

Narendra Dabholkar Death: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी (Narendra Dabholkar Death)आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. विरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष ठरवलं आहे. अंदुरे आणि कळस्कर यांना जन्मठेप आणि पाच लाख दंड सुनावला आहे.

या निकालानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो. प्रत्यक्ष मारेकऱ्यांना शिक्षा झालीय. जे सुटले त्यांच्याविरोधात आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढाई घेऊन जाऊ. या कटामागे जे सूत्रधार होते, मूळातला जो सूत्रधार आहे त्याला अटक झालेली नाही. या बाबींविरोधात आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाऊ.”

Narendra Dabholkar Death
Narendra Dabholkar Death

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं की, “11 वर्षांनंतर विवेकाच्या मार्गानं जाऊन न्याय मिळतो, ही भावना आमच्या मनात निर्माण झालेली आहे. ज्यांना सोडलं, त्यांना कुठल्या गोष्टींच्या आधारे सोडलं ते अजून कळालेलं नाहीये. कारण निकालाची प्रत हातात आलेली नाहीये. पण जे संबंधित होते, त्यांना 8 वर्षं तुरुंगात राहावं लागलं आहे. ती शिक्षा त्यांना मिळालेली आहे.”

मुक्ता यांनी पुढे म्हटलं की, “यामागचा मास्टरमाईंड अजून सापडलेला नाही, असं आमचं म्हणणं आहे. हा व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे असं सीबीआयनं म्हटलं आहे. तो कोण ते सीबीआयनं शोधणं गरजेचं आहे.” डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात (Narendra Dabholkar Death) सचिन अंदुरे, शरद कळस्कर, वीरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं होतं.

या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू होती. 2021 मध्ये या पाचही जणांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर हत्या, हत्येचा कट रचणे तसेच युएपीए अंतर्गत गुन्हे निश्चित करण्यात आले होते.

आरोपींचे वकील काय म्हणाले?

आरोपींचे वकील साळशिंगीकर म्हणाले की, “शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांना दोषी व्यक्त करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच 5 लाखांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा वाढेल असं न्यायालयानं म्हटलं आहे. इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. विक्रम भावे, संजीव पुनाळेकर, डॉ. वीरेंद्र तावडे यांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

“या केसमध्ये पुणे पोलिस, क्राईम ब्रँच आणि सीबीआय यांची वेगवेगळी थिअरी राहिली आहे. आज जरी दोघांना शिक्षा दिली असली, तिचा आदर करतो. निकालाची प्रत हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास करणार आणि नक्कीच उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार.”

सनातन संस्थेची प्रतिक्रिया काय?

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी प्रतिक्रिया दिलीय की, “डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या (Narendra Dabholkar Death) संदर्भात सनातन संस्थेचं निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे. देशभरात सनातन संस्थेला बदनाम करण्याचं षड्यंत्र आखलं गेलंय. त्या अर्बन नक्षलवादी शक्तींचा आज पराभव झालाय, असं आम्ही मानतो. कारण ज्या दिवशी डॉ. दाभोलकरांची हत्या झाली होती त्या दिवशीच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी हिंदुत्त्ववाद्यांचा हात आहे, असं म्हटलं होतं. या प्रकरणाची दिशा भरकटवण्यात आली होती.”

राजहंस पुढे म्हणाले, “याप्रकरणी सनातन संस्थेच्या विक्रम भावेंना 2 वर्षांचा कारावास अकारण भोगावा लागला. तर वीरेंद्र तावडे यांना 8 वर्षं कारावासात राहावं लागलं. तसेच हिंदुत्ववाद्यांचे वकील संजीव पुनाळेकर यांनाही 42 दिवस कारावासात ठेवण्यात आलं. हिंदुत्ववाद्यांना गोवण्यासाठी हे षड्यंत्र आखण्यात आलं होतं. आज न्यायालयाच्या निकालामुळे हे षड्यंत्र फसलं आहे. याप्रकरणी दोन हिंदुत्ववादी शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांना न्यायालयानं दोषी ठरवलं असलं तरी आमची खात्री आहे की त्यांनासुद्धा या प्रकरणात गोवण्यात आलं आहे आणि त्यांचे नातेवाईक याप्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागतील.”

पुणे पोलिसांनी केली होती पहिली अटक, पण…

पुणे पोलिसांनी या प्रकरणात जानेवारी 2014 मध्ये पहिली अटक केली. ती कथित बंदूक विक्रेता मनिष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांना. पण, याधीच्या प्रकरणात या दोघांचीही अटक वादग्रस्त ठरलेली होती. ठाणे पोलिसांनी 20 ऑगस्ट 2013 ला सायंकाळी चार वाजता खंडणीच्या प्रकरणात या दोघांना अटक केली होती. दाभोलकरांच्या हत्येनंतर (Narendra Dabholkar Death) काही तासांतच ही अटक झाली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये नागोरी आणि खंडेलवाल यांना महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आलं.

यावेळी त्यांच्याकडून 40 अवैध बंदुका जप्त केल्याचा दावा एटीएसने केला होता. यापैकी एक बंदुकीची मार्कींग ही दाभोलकरांच्या हत्या स्थळावरून जप्त केलेल्या काडतुसासोबत मिळती जुळती असल्याचं एटीएसचं म्हणणं होतं. एटीएसकडून ही माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. पण, सुरुवातीला 2012 च्या पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येच्या आरोपाखाली ही अटक होती. त्यानंतर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. पण, या प्रकरणात खरा ट्विस्ट आला तो 21 जानेवारी 2014 ला.

कारण, यावेळी या दोन्ही आरोपींनी कोर्टात एटीएस प्रमुखांवरच आरोप केले होते. एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोलकर हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा आरोपींनी कोर्टात केला होता. पण, त्यानंतरच्या सुनावणीत हे आरोप जाणीवपूर्वक केल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. पुणे पोलिसांनी या दोघांविरोधात आरोपपत्रपही दाखल केलं नव्हतं. या दोन्ही आरोपींचा या प्रकरणासोबत काहीही संबंध नसल्याचं समोर आलं. त्यानंतर कोर्टाने या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका केली.

पण, पुणे पोलिसांकडून तपास सीबीआयकडे कसा गेला? पुणे पोलिसांचा तपास भरकटताना पाहून सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी झाली. त्यानंतर मुंबई हायकोर्टानं जून 2014 मध्ये दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. या प्रकरणात सीबीआयनं पहिली अटक केली. 10 जून 2016 रोजी सनातन संस्थेशी संबंधित कान, नाक घसा (ENT Surgeon) तज्ज्ञ डॉ. विरेंद्रसिंह तावडेला अटक केली होती.

याआधी याच तावडेला पानसरे हत्या प्रकरणात 2015 ला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील एक सत्रूधार तावडे असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं. सनातन संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद हे या हत्येचं कारण असल्याचा दावा सीबीआयनं केला होता. तावडेविरोधात 6 सप्टेंबर 2016 ला हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. याच आरोपपत्रात सनातन संस्थेचे फरार सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयनं दावा केला होता.